यंदा साध्या पध्दतीने बाप्पाला देणार निरोप : अध्यक्ष तुळशीबागवाले
दरवर्षी मोठ्या उत्साहात गणरायचे आगमन होते. अगदी त्याच पद्धतीने गणेशविसर्जन केले जाते. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने अगदी साध्या पध्दतीने मिरवणूक न काढता कुठल्याही प्रकारची गर्दी न करता बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा गणेश महासंघाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक किशोर तुळशीबागवाले यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना सांगितले.
कोरोनाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गणेशोत्सव अगदी साध्या पध्दतीने साजरा करण्यात येत आहे. यंदा दहा दिवसांत गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची गर्दी न करता, देखावे न उभारता अगदी पारंपरिक आणि साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. बाप्पाचे आगमन देखील मिरवणूक न काढता गणपती बाप्पा मोरया म्हणत साध्या पध्दतीने करण्यात आले. यंदा सर्व कार्यक्रम रद्द करून महासंघासह अनेक गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य उत्सव साजरा करण्यात आला. याशिवाय उद्या कुठल्याही प्रकारची गर्दी न करता, मिरवणूक न काढता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.
यंदा ना मिरवणूक, ना ढोल,
ना ताशाचा आवाज घुमणार
दरवर्षी गुलालाची उधळण करत बाप्पाचा गजर करत ढोल, ताशाच्या आवाजात मिरवणूक काढून बाप्पाला निरोप देण्यात येतो. परंतु यंदा पहिल्यांदाच ढोल, ताशाचा आवाजाविनाच बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. मिरवणूक देखील रद्द करण्यात आल्या आहे. शहरातील 23 ठिकाणी बाप्पांच्या मूर्तीचे संकलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील काही गणेशमंडळानी स्वतः जबाबदारी घेऊन गर्दी न करता बाप्पाला निरोप देणार आहे. नागरिकांनी देखील सर्व नियमांचे पालन करूनच बाप्पाला निरोप द्यावा असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष किशोर तुळशीबागवाले यांच्या वतीने करण्यात आले आहे.